नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यात वादंग निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र निषेध व्यक्त होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी यावर थेट प्रतिक्रिया देत कठोर शब्दांत इशारा दिला आहे.
नागपूरमध्ये झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत एक कथन मांडले. या कथनात त्यांनी शिवाजी महाराज थकले होते आणि त्यांनी राज्यकारभार सोपवण्याबाबत उल्लेख केल्याचे सांगितले. यावरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.
“शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडं दिला,” हे तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. यापूर्वीही या भोंदूसह त्याच्या काही सहकाऱ्यांनी जगद्गुरु संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि एकूणच संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली होती. वारंवार अशाप्रकारची वक्तव्ये करून… pic.twitter.com/fruZIuyZXH
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 25, 2026
या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य संतापजनक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाबद्दल अशा प्रकारचे विधान करणे योग्य नाही.
रोहित पवार पुढे म्हणाले की, यापूर्वीही संबंधित व्यक्तीकडून संत परंपरेबाबत वादग्रस्त विधान करण्यात आली आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्यांना आळा घालणे गरजेचे आहे. तसेच, राज्यातील लोकांच्या भावना दुखावणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर विविध राजकीय नेते, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या वक्तव्याचा निषेध करत माफीची मागणी केली आहे, तर काहींनी कायदेशीर कारवाईचीही मागणी केली आहे.
सध्या या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील काही दिवसांत या वादावर आणखी घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

